शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर 2016 हा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवला जाईल. उरी येथील लष्करी तळावर पाकी दहशतवाद्यांनी जो निंदनीय हल्ला केला होता, त्याला चोख प्रत्युत्तर देताना, पहिल्यांदाच सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे तीन किलोमीटर अंतरापर्यंत घुसून दहशतवादी तळांवर हल्ला करून तब्बल 38 दहशतवादी, तर त्यांना संरक्षण देणाऱ्या 9 सैनिकांना कंठस्नान घातले. मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे 4 पर्यंत सुरू होती. शुक्रवारी सुमारे 11 च्या सुमारास हिंदुस्थानने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त सर्वप्रथम झळकले, आणि रात्री उशिरापर्यंत देशभरात दसऱ्यापूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली, येत आहे. पठाणकोट, उरी येथे हल्ला झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ इशारेच देण्याचेच काम करत असतील, तर त्यांच्यात आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यात फरक तो काय? असा खोचक प्रश्न विचारणाऱ्या देशद्रोही प्रवृत्तींना पंतप्रधान मोदी यांनी थेट पाकमध्ये घुसत धडक कारवाई करून, सडेतोड उत्तर दिले आहे. देशभरातून मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, लष्कराने केलेल्या या कारवाईचेही स्वागत होत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी एकत्र येऊन घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याची माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त देशभरात वाऱ्यासारखे पसरले.
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश, अशी पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर संभावना करून, त्याची चहुबाजूने कोंडी केल्यानंतर मगच मोदी यांनी पाकविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश लष्कराला दिले हे विशेष. त्यामुळेच पाकने तात्काळ अमेरिकेकडे गाऱ्हाणे मांडताच, अगोदर दहशतवादाची पाळेमुळे खंदून काढा अशा शब्दांत अमेरिकेने पाकला कानपिचक्या दिल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट भागावरच केली जाते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व बाबींचा विचार केला जातो. शक्यतो ही कारवाई रात्रीच्या वेळीच केली जाते. प्रत्येक कारवाई नियोजनाप्रमाणे केली जाते, तसेच घड्याळाच्या काट्यावरच ही कामगिरी पार पडते. हिंदुस्थानी लष्कराने म्यानमारमध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई केली होती. त्यावेळी पॅरा कमांडोंनी एका तासात 40 हून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी पोहोचविले होते. लष्कराने शुक्रवारी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची योजना गेल्या सात दिवसांपासून आखली जात होती. दहशतवाद्यांच्या तळावर लष्कर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवून होते. अमेरिकेत यूनोचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ही कारवाई लांबविण्यात आली, असे लष्करी सूत्रांनी म्हटले आहे. हेलिकॉप्टरमधून सैनिकांना पाकव्याप्त काश्मिरमधील सीमेपार उतरवले गेले, असे वृत्त सुरुवातील आले होते. मात्र, प्रत्यक्षात हवाई दलाने या कारवाईत भाग घेतला नाही, हे रात्री उशीरा स्पष्ट झाले. सुमारे 200 निधड्या जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडील 15 किलोमीटर परिसरातील 7 दहशतवादी तळांवर एकाचवेळी सैनिकांच्या 8 तुकड्यांनी हल्लाबोल केला. दहशतवादी तळावरील अतिरेक्यांचा खातमा केल्यानंतर दोन ट्रक्समधून पाकी सैनिक बचावासाठी आले होते, परंतु त्यांनाही ठार मारण्यात आले. प्रत्यक्षात किती दहशतवादी आणि पाकी सैनिक मारले गेले, याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसली, तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळेच एकही जवान जखमी झाला नाही.
पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील राष्ट्रीय कार्यकारणीवेळी बोलताना उरी येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशा शब्दांत पाकविरोधात कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. गेली दोन वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकभोवतालचे फास आवळण्यास सुरुवात केली होती. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा, त्यांची भलावण करणारा देश म्हणून पाकची संभावना केली होती. अमेरिकेसह युरोपलाही दहशतवादी कारवायांच्या झळा बसल्याने त्यांनी मोदी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अमेरिकन सिनेटने तर पाकला देण्यात येणारी आर्थिक रसद तोडली, तसेच शस्त्रास्त्रे देण्यासही नकार दिला. नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात तर सुषमा स्वराज यांनी पाकला अक्षरशः उघडे पाडले. मोदी यांनी आखलेली रणनिती पाहिली तर अचंबित व्हायला होते. 26 तारखेला सुषमा स्वराज यांनी अमेरिकेत पाकचा मुखवटा अक्षरशः टराटरा फाडला. 27 तारखेला पाकला दिलेला विशेष दर्जा करण्याबाबत तसेच इंडस पाणीवाटप कराराचा फेरविचार करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तर 28 तारखेला पाकमध्ये होऊ घातलेल्या सार्क परिषदेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय हिंदुस्थानने जाहीर केला. त्याला अफगाणिस्तान, बांगलादेश यांनी त्वरेने पाठिंबाही दिला. नेहमीप्रमाणेच हिंदुस्थान केवळ निषेधाचे खलिते पाठवणार, अशी कडवट टीका होत असतानाच, अचानक सर्जिकल स्ट्राईक करून ना केवळ पाकला मात्र अवघ्या जगाला हिंदुस्थानने चकीत केले.
फ्रान्ससोबत राफेल विमानखरेदीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्याचवेळी ही कारवाई केव्हा करायची हे निश्चित झाले होते, असे ठामपणे म्हणता येते. 36 विमानांसाठीचा तब्बल 7.8 बिलियन युरोचा हा करार आहे. हिंदुस्थान महासत्ता म्हणून उदयास येत असतानाच, येथील बाजारपेठा या अमेरिकेसह युरोपीयन देशांना भूरळ घालत आहेत. मोदी यांनी फ्रान्सला करारात अडकवले, तर संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत भाषण करताना, सुषमा स्वराज यांनी अमेरिकेतील ट्विन टॉवरवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासह पॅरीस येथील हल्ल्याच्या स्मृतीही जागवल्या. दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकबाबत फेरविचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
गेल्या वर्षी पाकने तब्बल 98 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते, तर यंदा 20 वेळा. प्रत्येक देशाला आपल्या सीमांचे रक्षण करण्याचा तसेच देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. याच न्यायाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. गंमतीचा भाग म्हणजे हिंदुस्थानी डीजीएमओ रणवीर सिंग यांनी पाकी डीजीएमओ यांना दूरध्वनीवरून या कारवाईची माहिती देत, तुमच्या भूमीवरील दहशतवाद्यांचा हिंदुस्थानी सैनिकांनी समाचार घेतला असल्याचे सांगितले.
या मोहिमेचे विशेष म्हणजे हिंदुस्थानी लष्कराला पाक सैनिकांच्या तळावरही हल्ला चढवणे सहज शक्य होते. मात्र, केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून हे सैनिक परतले. मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती असेल, तर होऊ शकते, हे दाखवून दिले. पाकची अवस्था अवघड जागच्या दुखण्यासारखी झाली आहे. दहशतवादी तळावर हल्ले झाले, हे मान्य करावे, तर दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे मान्य केल्यासारखे होते. त्यामुळे सीमेवर झालेल्या चकमकींत दोन सैनिक ठार झाले, असी सारवासारव त्यांनी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतकी धाडसी कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवताच अवघ्या 200 सैनिकांनी प्राणांची पर्वा न करता, नियंत्रण रेषा पार करून, दहशतवाद्यांचा खात्मा केला.
उरी येथील लष्करी तळावर पहाटेच्या सुमारास जो आत्मघाती हल्ला पाकने घडवून आणला होता, त्याचा सल प्रत्येक नागरिकाच्या मनात होता. आता बास झाले, असे सुरक्षा दलातील प्रत्येकाला वाटत होते. मोदी पंतप्रधान असल्यामुळे जनतेच्या आशा वाढल्या होत्या. मोदी यांनीही अपेक्षांचा भंग होऊ दिलेला नाही. उरी हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल, फक्त वेळ आणि काळ आम्ही ठरवू, असे लष्कराने पाकला ठणकावून सांगितले होते. त्याप्रमाणे पितृपक्षातच दहशतवाद्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकी सैनिकांना कंठस्नान घालत, उरीत शहीद झालेल्या 18 जवानांना खऱ्या अर्थाने पिंडदान करण्यात आले आहे. आम्ही मागेही म्हटले होते, मोदी आपल्यावरील आरोपांचे शाब्दिक खंडन करण्याच्या अजिबात फंदात पडत नाहीत. त्यांनी अक्षरशः कमीत कमी वेळात जास्तीत जास्त देशांचा दौरा केला. हॉटेलातील वास्तव्य टाळत प्रसंगी विमानातच विश्रांती घेत त्यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण नव्याने आखले. विरोधकांनी त्यांच्या विदेश दौऱ्यांवरून त्यांची खिल्ली उडवली. पण दिवसातील 15-16 तास अविरत काम करणाऱ्या मोदी यांनी केलेल्या विदेशवाऱ्या व्यर्थ गेल्या नाहीत, हे स्पष्ट झाले. एकाही देशाने हिंदुस्थानला ही कारवाई का केलीत? असे विचारले नाही. यातच सारे काही आले.
हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला आज मोदी यांचा अभिमान वाटतो आहे.